अन्न हेच पूर्णब्रह्म हा सोप्या, साध्या आणि रोजच्या जेवणातल्या रेसिपींचा ब्लॉग आहे. मजा म्हणून सुरू केलेला हा ब्लॉग मला खरोखरच खूप आनंद देतो. तुमच्या प्रतिक्रियांचं आणि सूचनांचं स्वागत आहे.
मी सायली राजाध्यक्ष. मूळची मराठवाड्यातली आणि आता गेली पंचवीस वर्षं मुंबईत स्थायिक झालेली. मला पारंपरिक भारतीय स्वयंपाकाचं विशेष आकर्षण आहे. त्यामुळे या ब्लॉगवर तुम्हाला बेकिंगच्या फारशा रेसिपीज आढळणार नाहीत.
खरंतर पूर्वी मी नियमितपणे ब्लॉग लिहीत असे. पण हल्ली नवीन व्यवसायाच्या धावपळीत ते होत नाही. मी नवीन वर्षांचे संकल्प करत नाही पण यावर्षी मात्र ब्लॉग नियमितपणे लिहिण्याचा संकल्प केलेला आहे.
अन्न हेच पूर्णब्रह्म

मी जेव्हा माझ्या स्वयंपाकावर प्रभाव पाडणा-या माझी आजी, आई, काकू, बहिणी, सासूबाई यांचा विचार करत होते तेव्हा मला एक गोष्ट जाणवली. या सगळ्याजणी आपापलं घर सोडून एका नवीन वातावरणात राह्यला आल्या, त्या वातावरणाला त्यांनी नुसतं आपलं म्हटलं नाही तर आपलंसं केलं. प्रत्येक माणूस हा लहानपणापासून आपल्या घरातल्या एका विशिष्ट प्रकारच्या खाण्याशी मनानं बांधला गेलेला असतो. जसंजसं आपण मोठं होतो, आपण खाण्यापिण्याचे वेगवेगळे प्रयोग करतो. म्हणजे मी आणि निरंजन कुठेही बाहेरगावी गेलो किंवा परदेशी गेलो तर आम्ही तिथे आपल्या पद्धतीचं खाणं शोधत नाही तर तिथलं जे काही वैशिष्ट्य असेल असे पदार्थ आवर्जून खातो. आम्हाला ते मनापासून आवडतंही. पण असं असलं तरी जेव्हा ब-याच दिवसांनंतर घरी येतो तेव्हा घरचा गरम वरण-भात किंवा पिठलं-भातच हवासा वाटतो. तो खाण्याची ओढ असते. याचं कारण मला असं वाटतं, की प्रत्येक घराचं एक कम्फर्ट फूड असतं. त्या घरातले सदस्य त्या कम्फर्ट फूडनं घट्ट एकत्र बांधले गेले असतात. आणि त्यामुळेच ते घर एकत्र राहतं. निदान मला तरी असं वाटतं.


