श्रावणात उत्तम पालेभाज्या मिळतात. शिवाय ब-याचशा रानभाज्याही मिळतात. विशेषतः कोकणात रानभाज्या ब-याच मिळतात. श्रावणात हमखास केली जाणारी पालेभाजी म्हणजे अळू. अळूची ब्राह्मणी पद्धतीनं केलेली चिंचगूळ घातलेली भाजी फर्मास लागते. सारस्वतांमध्ये अळूची चिंचेचा कोळ आणि खोब-याचं वाटण लावून भाजी करतात. पण मला ती फारशी आवडत नाही. अळूचा कुठलाही पदार्थ करताना त्याला चिंचेचा कोळ लावतातच, याचं कारण असं आहे की अळू बरेचदा खाजरा असतो. चिंच लावल्यामुळे त्याचा खाजरेपणा कमी होतो.
अळू ही मूळची रानभाजी. म्हणजे ती रानावनातच आपोआप उगवत असे. हळूहळू तिचा खाण्यासाठी वापर व्हायला लागला. जसजसा खाण्यासाठी वापर व्हायला लागला तसतसा अळू मुद्दाम पिकवला जायला लागला. अळूचं मूळ भारताचा पूर्व भाग, नेपाळ आणि बांगलादेशात असावं असं मानलं जातं. आता अळू जगभर खाल्ला जातो. अळूची पानं सुपासारखी असतात. कोवळ्या पानांची भाजी केली जाते. तर जरा जून पानांच्या वड्या केल्या जातात. अळकुड्या किंवा अरवी म्हणजेच अळूचे कंद. अरवीचीही चिंच घालून भाजी केली जाते. अळकुड्यांची कुरकुरीत परतून केलेली भाजी तोंडीलावणं म्हणून छान लागते. भारतातल्या बहुसंख्य राज्यात अळू खाल्ला जातो. मांसाहारी पदार्थांमध्येही अळूचा वापर केला जातो. महाराष्ट्र तसंच गुजरातेत अळूवड्या लोकप्रिय आहेत. बारीक कोलंबी घालूनही अळूवडी करतात. मी एका रेसिपी शोमध्ये तयार अळूवड्यांवर नारळाचं दूध घालून त्या झाकून ठेवून मस्त फुलवून केलेला पदार्थ बघितला होता. तोही मस्त लागत असणार.
अळूला भरपूर पाणी लागतं. त्यामुळे अळू नेहमी पाण्याच्या एखाद्या डबक्यात लावला जातो. बरेचदा सांडपाण्यात अळूची आळी दिसतात. बीडला आमच्या बागेत अळूचं मोठं आळं होतं. सगळ्या गल्लीतले लोक आमच्या घरून अळू नेत असत. माझी आई अळूच्या पानांची भजी आणि त्या भज्यांची चिंच-गूळ घालून मस्त भाजी करते. सध्या श्रावणात बरेच लोक मांसाहार करत नाहीत. अशांना चमचमीत खायला म्हणून या दिवसांत बरेचदा तळलेले पदार्थ हवे असतात. मग बरेचदा अळूवडी केली जाते. आज मी अळूवडीचीच रेसिपी शेअर करणार आहे.
अळूवडी
साहित्य – १५-१६ वडीसाठीची अळूची पानं, २ वाट्या डाळीचं पीठ, २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ, २ टेबलस्पून गूळ, २-३ टीस्पून तिखट, प्रत्येकी २ टीस्पून धणे-जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, वड्या तळण्यासाठी तेल
कृती –
१) अळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करा. पानं कोरडी झाल्यावर पुसून घ्या. उलटी करून हलक्या हातानं त्यावर लाटणं फिरवा म्हणजे त्यांच्या शिरा जरा दबतील आणि पानं मऊ होतील.
२) बेसनात सगळं साहित्य घाला आणि पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवा.
३) आता अळूची पानं उलट्या बाजूंनी आकारानुसार घ्या. सगळ्यात मोठं पान घेऊन त्यावर तयार मिश्रण हातानं लावा. हे मिश्रण पानावर एकसारखं पसरवा.
४) त्यावर दुसरं पान ठेवा. परत मिश्रण पसरवा. अशी ७-८ पानं एकावर एक ठेवत जा. नंतर या पानांचा घट्ट रोल करा. असे जितके होतील तितके रोल करून घ्या.
५) कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यात हे रोल ठेवा. शिटी न लावता २०-२५ मिनिटं उकडून घ्या.
६) थंड झाल्यावर आपल्याला हव्या त्या जाडीच्या वड्या कापा.
या वड्या तुम्ही पॅनमध्ये शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायही करून उत्तम लागतात. किंवा फोडणीला मोहरी, हिंग, तीळ घालून या वड्या परतवा. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घाला. किंवा तेल-मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यावर वड्या घाला. जराशा परतून त्यात थोडं उकळतं पाणी, चिंचेचा कोळ, गूळ, थोडा काळा मसाला घालून अंगासरशी रस्सा करा.
तिखटमिठाचं आणि चिंचगुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमीजास्त करा. इतक्या पानांमध्ये २५-३० अळूवड्या होतात.
सायली राजाध्यक्ष
अळूवडी ची ही रेसिपी छान आणि सोपी आहे..Thanks
पण ह्यात चवीसाठी अर्थात आवडीनुसार लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून ही वडी खूप छान लागते.
LikeLike
Thank you so much .. mala hi recipe khup diwasanpasun havi Hoti
LikeLike