स्वयंपाक एक आवश्यक काम

एका तरूण मैत्रिणीनं परवा एका ग्रुपमध्ये एक झटपट भाजीची मस्त रेसिपी शेअर केली. ती सेव करावी म्हणून आज परत त्या पोस्टवर गेले तर तिथे एक कमेंट वाचायला मिळाली. त्या मैत्रिणीला उद्देशून कुणीतरी लिहिलं होतं की तू इतका स्वयंपाक करायला लागलीस तर आता काकूबाईच झालीस. मला वाचून गंमत वाटली.

मागेही फेसबुकवर एका विदुषीनं स्वयंपाक करणं बिनडोकपणाचं आहे असं म्हटलेलं वाचलं होतं. स्वयंपाक करायला आवडणं किंवा न आवडणं हा आपापल्या आवडीचा भाग असू शकतो. त्यामुळे ज्यांना स्वयंपाक करायला आवडत नाही त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये, त्यात मला काहीच गैर वाटत नाही. पण जे आवडीनं स्वयंपाक करतात ते बिनडोकपणाचं काम करतात असं मला वाटत नाही.

आपलं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर उत्तम अन्न खाल्लं पाहिजे. भारतासारख्या हवेत ते अन्न ताजं खाल्लं पाहिजे. आपण खातो त्या अन्नातून आपल्याला नीट पोषणमूल्यं मिळतात ना याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. मग भलेही तुम्ही स्वतः स्वयंपाक करा किंवा कुणाकडून करून घ्या. स्वयंपाक करणं आवडत नसेल तर स्वयंपाक करणारा किंवा करणारी मदतनीस ठेवा. तुम्हीच स्वयंपाक केला पाहिजे असं अजिबात नाही. पण जो तुम्हाला रूचकर, पौष्टिक अन्न खाऊ घालतो किंवा घालते त्यांच्या कष्टाचा आदर करा. उत्तम, पौष्टिक जेवण हा आपल्या दिनचर्येतला फार महत्त्वाचा भाग आहे.

मी मागेही स्वयंपाकाच्या नियोजनाबद्दल पोस्ट्स लिहिलेल्या आहेत. त्या ब्लॉगवर उपलब्धही आहेत. पण आज परत एकदा त्याबद्दल थोडंसं लिहिते. हल्ली जवळपास बहुतांश स्त्रिया कामासाठी घराबाहेर पडतात किंवा घरून काम करतात. जेव्हा घरातला पुरूष आणि स्त्री असे दोघेही कामासाठी बाहेर पडत असतील तेव्हा स्वयंपाकाचं नियोजन फार आवश्यक ठरतं.

दिवसभर काम करून थकून आल्यावर साग्रसंगीत ताजा स्वयंपाक करणं नकोसं वाटू शकतं. मग यासाठी काय करता येईल?

१) दोघंही कामासाठी बाहेर पडत असाल आणि घरात मुलं सोडून इतर सदस्य नसतील तर मग आठवड्याचा एक ढोबळ मेन्यू ठरवून ठेवा.

२) मेन्यू ठरवताना घरात उपलब्ध असलेले घटक पदार्थ तसंच तुम्ही सहज आणू शकाल असे घटक पदार्थ लक्षात घ्या.

३) मेन्यू ठरवला की सुटीच्या दिवशी त्यानुसार भाज्या, फळं, मासे, मटन-चिकन खरेदी करा. घरी आल्यावर मासे-चिकन-मटन स्वच्छ करून त्याला आवश्यक ते मसाले लावून फ्रीजरला ठेवून द्या. किंवा नुसतंच धुवून फ्रीजरला ठेवा.

४) फळभाज्या आणि फळं पाण्यात बुडवून ठेवून स्वच्छ धुवून घ्या. ते पंचावर घालून नीट कोरडे होऊ द्या. पालेभाज्या निवडून स्टीलच्या डब्यात ठेवून द्या. त्या करतानाच धुवा.

५) हे केल्यानंतर मेन्यूप्रमाणे आदल्या दिवशी तयारी करत जा. किंवा आपल्या मदतनीसाकडून तयारी करून घ्या. जसं की इडली-डोसा करायचा असेल तर पीठ भिजवणं, ते वाटणं. चटणीसाठी नारळ खोवून फ्रीजरला टाकणं, सांबारसाठी चिंचेचा कोळ काढून फ्रीजमध्ये ठेवणं इत्यादी.

६) दुस-या दिवशीची भाजी ठरलेली असेल तर तीही चिरून हवाबंद डब्यात, हवाबंद काचेच्या भांड्यात ठेवून द्या. त्यासाठी लागणारं कांदा-टोमॅटो चिरून असंच ठेवून द्या. फक्त पालेभाज्या आणि कोथिंबीर मात्र ऐनवेळी चिरा.

७) सकाळी जास्त वेळ असेल तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची थोडी तयारी करून ठेवा. जसं की आमटी करणार असाल तर सकाळीच एका बाजूला डाळ शिजवून ठेवून द्या. पोळ्याही सकाळ-संध्याकाळच्या एका वेळेला करता येतात.

८) बाहेर पडताना नीट नाश्ता करून बाहेर पडा. बरोबर डब्याबरोबर एखादं अख्खं फळ बरोबर ठेवा. एखाद्या लहानशा डबीत सुकामेवा किंवा चणेशेंगदाणे ठेवा.

९) संध्याकाळी परतलात की गरम भाताचा कुकर लावू शकाल. भात झाल्यावर त्याच कुकरमध्ये पोळ्यांचा डबा थोडावेळ ठेवलात की पोळ्या छान गरम होतात. तोपर्यंत आमटी किंवा जे काही कालवण करायचं असेल ते होऊ शकतं. कोशिंबीर करायला तर दहा मिनिटं पुरतात.

१०) किंवा संध्याकाळी फक्त भात आणि एखादं कालवण तसंच कोशिंबीर इतकं जेवण पुरू शकतं. जसं की चिकन-मटन रस्सा, माशांचं कालवण, आमटी-पिठलं-वरण.

कधीतरी बाहेर जाऊन जेवायला हरकत नाही, किंबहुना जावंच. पण वारंवार घरी मात्र बाहेरचं जेवण मागवू नका. विशेषतः प्लॅस्टिकच्या पिशवीत गरम भाज्या-आमट्या मिळतात ते अजिबात मागवू नका. ते अतिशय हानीकारक ठरू शकतं. स्वयंपाकाचं नियोजन करताना रोज एक पालेभाजी, एक फळभाजी, एक कडधान्य आणि एक डाळ असा विचार करून ठरवा. मांसाहारी खाणा-यांनी कडधान्याऐवजी किंवा डाळीऐवजी चिकन-मटन-माशांचा विचार करावा. टीनमधले किंवा रेडी टू इट पदार्थ शक्यतो खाऊ नका.

साधं वरण-भात, पिठलं-भात, मूगडाळीची भाज्या घालून खिचडी, कुकरला झटपट केलेली उसळ, एखाद्या उसळीवर कांदा-कोथिंबीर-चटण्या घालून केलेली झटपट मिसळ, तळलेले मासे आणि पोळी, फिशकरी-भात असे खूप सोपे पर्याय सहज करता येतात जे पोटभरीचे आणि पौष्टिकही आहेत.

स्वयंपाक करणं हे एक आवश्यक काम आहे. वर म्हटलं तसं ते न आवडण्यात काहीच गैर नाही. पण मग ते मदतनीसाकडून तरी करून घ्या. सुदैवानं आपण अशा देशात राहतो की जिथे मदतनीस स्वस्त आहेत आणि सहज मिळतात. नीट नियोजन केलंत तर हे फार सोपं होऊ शकतं. जिथे म्हणजे परदेशात मदतनीस नसतातच तिथे बहुतेकांना कामाचा कंटाळा नसतो कारण सगळं काम स्वतःला करावं लागतं. त्यामुळे तिथे बहुतेकदा स्वयंपाकाचं नियोजन असतंच.

तर मग नियोजन करा आणि स्वयंपाकाचा आनंद घ्या. आवडत नसेल तर मनाविरूद्ध करू नका. पण जे करतात ते बिनडोकपणाचं काम करतात असं सरसकट विधान करू नका!

#किचनमॅनेजमेंट #गृहव्यवस्थापन #स्वयंपाकाचंनियोजन #अन्नहेचपूर्णब्रह्म #homemanagement #kitchenmanagement #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

13 thoughts on “स्वयंपाक एक आवश्यक काम

  1. तूम्ही अगदी बरोबर लिहीले आहे. घरचा स्वयंपाक करणं एखाद्याला कितीही कंटाळवाणे तरी त्याच्याशिवाय पर्याय नाही. ते करणं म्हणजे बिनडोकपणा नसून खूपच कल्पकतेचे काम आहे. अनेक वर्षे मी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहीले. बाहेरचे पदार्थ पण अगदी कंटाळा येईपर्यंत खाल्ले. आता लग्न झाल्यावर पूर्णवेळ गृहिणी आहे. पण अजूनही घराचे नियोजन करणे, स्वयंपाकाचे नियोजन करणे मला जडच जाते. लग्नानंतरचे वेगळे पदार्थ कालांतराने तेच तेच वाटू लागतात. तेव्हा खरी परीक्षा सुरू होते. तेव्हा मग सायली ताई तुम्ही, आणि यु-ट्यूब च्या फूड चॅनल चालवणाऱ्या मैत्रिणी मदतीला येतात. त्याच कांद्या-बटाट्याचे असंख्य पदार्थ दिसू लागतात.
    जस जसे वय वाढते तस तसे बाहेर खाल्लेल्या पदार्थाचे दुष्परिणाम दिसू लागतात. सोडा घालून शिजवलेले, त्याच त्याच तेलात तळलेले, सोमवारी बनलेले आठवडाभर गरम करून वाढलेले पदार्थ त्या रेस्टॉरंटच्या माहोलमध्ये आपल्याला काळत नाहीत. ते फक्त पोट भरतात.
    रोजचा स्वयंपाक करायला मदतनीस घेऊन हेच पदार्थ घरी बनवू शकतो, स्वतः शिकू शकतो. एखादया वेळी रेस्टॉरंटमध्ये नवीन पदार्थ चाखायला जाणे आणि तो पुन्हा घरी तसाच करून पाहण्याचे चॅलेंज स्वीकारण्यात एक वेगळाच आनंद असतो. घरात असे ताजे ताजे , पौष्टिक, स्वच्छ जागेत बनवून त्याची मजा चाखाण्याचा आनंद जरूर घेतला पाहिजे. काय म्हणता ??

    Like

    1. अगदी बरोबर लक्ष्मी. वय वाढलं की समजूतही वाढते आणि सगळ्या गोष्टींचं महत्त्व लक्षात येतं आपल्या.

      Like

  2. Hi Sayali!
    This is Aparna – Milind’s sister. Remember, we met a few days back at the screening of Gulabjam. I am finally here – at your place! 🙂 And boy! You won me in this very first article. Very well said!!
    I will now be a regular visitor of your blog. Keep up the good work.
    Best regards,
    Aparna

    Like

  3. Hello sayli tai..

    तुमचा प्रत्येक लेख आमच्या साठी आनंददायी आणि मार्गदर्शक असतो..स्वयंपाक करणे आनंदाचे वाटू लागले आहे..आणि जेव्हा आपल्या घरातली मंडळी कौतुक करून पोटभर जेवतात तेव्हा मिळणाऱ्या समाधानाच्या पावतीने तृप्तीची भावना मिळते ..खऱ्या अर्थाने अन्नदाता सुखी भव या उक्तीची जाणीव होते..तुम्ही असेच लेख रेसिपीज आमच्याशी शेअर करा नक्की …

    Like

  4. Hello sayli tai..

    तुमचा प्रत्येक लेख आमच्या साठी आनंददायी आणि मार्गदर्शक असतो..स्वयंपाक करणे आनंदाचे वाटू लागले आहे..आणि जेव्हा आपल्या घरातली मंडळी कौतुक करून पोटभर जेवतात तेव्हा मिळणाऱ्या समाधानाच्या पावतीने तृप्तीची भावना मिळते ..खऱ्या अर्थाने अन्नदाता सुखी भव या उक्तीची जाणीव होते..तुम्ही असेच लेख रेसिपीज आमच्याशी शेअर करा नक्की …

    Like

  5. नेमक्या शब्दात सांगितलं. स्वयंपाक करणं हे बिनडोक वा काकुबाईंचं काम असतं असं वाटतं काहींना ह्याची खंत तर आहेच. पण आवश्यक का आहे ह्यासाठी हा लेख खुपच उपयुक्त आहे.
    अन्न ही मनुष्याची प्राथमिक गरज असताना त्याकडे इतका दुर्लक्षित दृष्टिकोण असता कामा नये आणि ताई तुला तर माहितच आहे की मला जेवणाची आवड तुमच्या ब्लॉग आणि खाण्याच्या लिखणाने सुरु झालेली आहे. कित्येक तुमच्या गोष्टी मी follow करण्याचा प्रयत्न करतेय. जसं की प्लास्टिक मुक्त स्वयंपाकघर. माझा धसमुसळा स्वभाव माझ्या स्वयंपाकघरात आवरते. आजतागायत एकच काचेची बरणी फुटलीये. माझ्यासाठी ही माझी avhievement आहे.
    तुझं लिखाण माझ्यासाठी नेहमीच प्रेरणात्मक राहिलेलं आहे भले मग ते खाण्याबद्दल असो वा आरोग्याशी निगडित असो.

    Like

  6. Sayli Tai khupach sunder lekh ahet saglech …
    Mala tumchya lekhanche vishay khupach avdale Tey aplya rojchya ayushyatle ahet..
    Please aluchya wadyanchi recipe sangi shakal ka ?

    Like

Leave a comment