३१ मार्च हा सब्जी तरकारी दिवस म्हणून पाळला जाणार आहे. आपला देश समशीतोष्ण हवामानाचा आहे. एरवी आपल्याला उन्हाचा कितीही त्रास वाटला तरी आपण नशीबवान आहोत की आपल्याला इतकं ऊन मिळतं. समशीतोष्ण हवामानामुळे आपल्याकडे वर्षभर चांगल्या भाज्या आणि मोसमी फळं मिळतात.
पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला जातो पण भारतात मांसाहारी लोकसुद्धा भरपूर भाज्यांचा वापर करतात. आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि इतर पोषणमूल्यं मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे भरपूर भाज्या खाणे.
मला आठवतं लहानपणी पानात पहिल्यांदा वाढलेलं खायचंच असा दंडक होता. कितीही नावडीची भाजी असली तरी ती खावी लागायचीच. पण खाऊन खाऊन त्या भाज्याही कधी आवडायला लागल्या ते कळलंच नाही. आज अशी एकही भाजी नाही की जी मी खात नाही. अर्थात काही भाज्या जास्त आवडतात तर काही कमी पण सगळ्या भाज्या केल्या आणि खाल्ल्या जातात.
आपल्याकडे भाज्यांचं किती वैविध्य आहे बघा ना. पालेभाज्या बघितल्या तर पालक, मेथी, चवळी, माठ, चुका, घोळ, चिवळी, चंदनबटवा, चाकवत, पोकळा, शेवग्याचा पाला, मुळ्याचा पाला, हरभ-याचा पाला, तांदुळजा, करडई, अंबाडी, कांद्याची पात अशा अनेक भाज्या मिळतात. शिवाय पावसाळ्यात मोसमी रानभाज्याही मिळतात. फळभाज्यांमध्येही असंच आहे. भोपळा, दुधी, दोडका, पडवळ, कारली, फ्लॉवर, कोबी, वांगी, पापडी, गवार, फरसबी, श्रावणघेवडा, चौधारीच्या शेंगा, काकडी, गाजर, परवर, अळकुड्या, बीट, मुळा, सिमला मिरची, भेंडी, तोंडली, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, कांदे, बटाटे, रताळी. नावं घ्यावीत तितकी कमी आहेत.
अनेकांच्या घरात ठराविक भाज्या केल्या जातात कारण घरातल्यांची नवीन चवी घेऊन बघायची इच्छा नसते. मला एक बरं वाटतं की लहानपणी पानातलं संपवण्याची सक्ती असल्यानं सगळ्या भाज्या खाण्याची सवय लागली आणि त्याचा फायदाच झाला. माझ्या मुलींनाही मी लहानपणापासून वेगवेगळ्या स्वरूपात भाज्या खायला घालायचा प्रयत्न केला. त्या भाज्या खातातच पण त्यांच्या भाज्यांमध्ये बेसिल, केल, झुकिनी, लाल-पिवळ्या सिमला मिरच्या, पार्सले, ब्रोकोली अशा भाज्यांचीही भर पडली आहे. पण हरकत नाही. या भाज्याही आता आपल्याकडे पिकवल्या जातात त्यामुळे त्या कोप-यावरच्या भाजीवाल्याकडेही मिळतात. खाद्यसंस्कृती सतत उत्क्रांत पावत असते त्यामुळे या नवीन भाज्याही आता आपल्याकडे रूळायला लागल्या आहेत.
कांदा-लसूण-मिरचीच्या फोडणीवर परतलेल्या साध्या पालेभाज्या, भेंडी-तोंडली-कारल्याच्या काच-या, पालक-मेथीचं वरण, करडई-मेथीची डाळभाजी, भोपळ्याचं आणि दुधीचं रायतं, फ्लॉवरचा रस्सा, भाज्या घालून केलेला पुलाव, कोबी-कोथिंबिरीच्या वड्या, मेथी-पालकाच्या पराठे आणि पु-या, काकडी-गाजर-बीटची कोशिंबीर, चंदनबटवा-पोकळ्याची ताकातली भाजी, गवार-घेवड्याची काळा मसाला घालून केलेली भाजी, भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार, बटाटा-वांग्यांचे काप, घोसाळ्याची भजी, मिरचीचा ठेचा, शेवग्याच्या शेंगांची कढी-वरण-पिठलं, भाज्यांची सूप्स, मेथीचा-कांद्याच्या पातीचा घोळाणा, भरली वांगी-कारली-दोडकी, वांगी भात-मटार भात-पुलाव, किती पदार्थांची नावं घ्यावीत…
भाज्या वापरून किती काय काय करता येऊ शकतं. आपल्या सुदैवानं आपल्याकडे कोप-याकोप-यावर भाजीवाले असतात. अजूनही अनेक ठिकाणी तात्पुरते बाजार भरतात जिथे जवळच्या खेड्यांमधून ताज्या भाज्या येतात.
आपल्या रोजच्या जेवणात वरण, भाजी, कोशिंबीरी, अगदी मांसाहारी पदार्थांमध्येही शक्य त्या आणि शक्य तितक्या भाज्यांचा समावेश करा आणि आरोग्य राखा.
#साधीराहणी #सब्जीतरकारीदिन #हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #mumbaimasala #sabjitarkaridin #healthiswealth #healthyliving #healthyeating #simpleliving
सायली राजाध्यक्ष
Hi
This is related to your saree blog. Couldnt find a comment section there.
Where in mumbai would i get a wide range of block printed kalamkari or similar cotton material to stitch blouses for cotton sarees?
LikeLike